छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून आज पहिल्याच दिवशी परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या वाहनाला बिलोली गावाजवळील अपघात झाल्याची घटना दि.११ घडली. या दुर्घटनेत एकूण ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला जास्त दुखापत झाल्याने त्याच्यावर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर ४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याने ते उपचार न करताच वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचले.
आजपासून बारावीच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली. लाख खंडाळा येथील परीक्षा केंद्रावर जात असताना बिलोली गावाजवळ विद्यार्थ्यांची गाडी पलटी होऊन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार किरकोळ जखमी विद्यार्थी हे उपचार न घेता परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. जखमी सर्व विद्यार्थी खंडाळा गावातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. ते सकाळीच एका कार मधून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघाले होते.