मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्रिभाषा धोरणावरून राज्यात बराच गदारोळ झाला होता. पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याला विरोध करण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारला आपला GR मागे घ्यावा लागला होता. सरकारने आपला निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या विरोधात डीजीपींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण?
‘काल एका व्यापाऱ्याच्या कानफडात मारली. त्याच्या माथ्यावर लिहिलं होतं का गुजराती. इतर हिंदी आणि वेगळ्या चॅनलमध्ये गुजराती माणसाला मारलं. बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. गुजरात्याला मारलं का. किती व्यापारी आहे. अजून तर काही केलं नाही. त्यांना मराठी आली पाहिजे. यात वाद नाही, ऊठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे’ असे राज ठाकरे म्हणाले होते.
पुढे ते म्हणाले होते की, ‘पण चूक त्यांची असली पाहिजे. अशी कधी गोष्ट कराल तर त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगणारा नसतो. मार खाणारा सांगतो. मला मारलं. त्यांना सांगू देत. पण ऊठसूट कुणाला मारू नका. अनेक लोक आहेत. माझ्या परिचयाचे आहे. माझा मित्र आहे, नयन शाह. मी त्याला गुजराठी म्हणतो. तो अप्रितम मराठी बोलतो. पण विनोदाचं अंग आहे. शिवाजी पार्कात हेडफोन लावून पुलं देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं हे बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं.’असे राज ठाकरे म्हणाले होते.