ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रेशनकार्ड ई-केवायसीसाठी अंतिम मुदत आता ३१ जुलै पर्यंत

लाभ थांबू नये म्हणून नागरिकांनी तत्काळ पूर्ण करावी : तहसीलदार विनायक मगर

अक्कलकोट : प्रतीनिधी

रेशनकार्डवरील लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक असून त्यासाठी सरकारने अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळावे, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे, असे तहसीलदार विनायक मगर यांनी सांगितले.

ई-केवायसी केले नसल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही आणि अशा रेशनकार्डवर शिधावाटप थांबवण्यात येईल. शिवाय, कार्ड निष्क्रिय होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया टाळाटाळ न करता लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.

ई-केवायसी प्रक्रियेसाठी लाभार्थ्याने आधारकार्ड साठव करून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे लागेल. हे करताना आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असून, यासाठी कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच रेशनकार्ड अपडेटसाठी नवीन फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. ही प्रक्रिया संपूर्णपणे मोफत आणि सोपी आहे.

आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक करण्यासाठी लाभार्थी rcms.mahafod.gov.in या अधिकृत शासकीय संकेतस्थळावर ‘पब्लिक लॉगिन’द्वारे लिंक करू शकतात. तसेच जवळच्या शिधावाटप कार्यालयात जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.ई-केवायसी करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत शासनाचा अधिकृत Mera e-KYC App
किंवा जवळचे रेशन दुकान. लाभ थांबू नये म्हणून सर्वांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. ही प्रक्रिया केवळ शासनाच्या लाभांची सुनिश्चितता नाही, तर गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन आहे.रेशनधारकांनी अंतिम मुदतीपूर्वी आपली ई-केवायसी पूर्ण करून शिधावाटपाचा लाभ नियमित मिळावा, यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसील तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!