बीड : वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी देशभर चर्चेत येत असतांना पुन्हा एकदा परळीतून राखेची वाहतूक करणाऱ्या हायवाच्या धडकेने आणखी एका सरपंचाचा मृत्यूची घटना शनिवारी रात्री घडली. हा अपघात आहे की घातपात असा संशय व्यक्त केला जात अाहे. अभिमन्यू पांडुरंग क्षीरसागर असे मृत सरपंचाचे नाव आहे. ते सौंदाणा (ता.अंबाजोगाई) गावाचे सरपंच होते.
परळी वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची हायवाद्वारे वाहतूक केली जाते. शनिवारी रात्री ९ वाजता सौंदाणा येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर (४९) हे दुचाकीने परळीकडे येत होते. मिरवट पाटीजवळ समोरून येणाऱ्या हायवाने (एमएच ४४ यू २११७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. हायवाचालक भोजराज देवकर (रा.परळी) हा फरार झाला.
परळीत अवैध राखेची जी लूट सुरू आहे त्या टिप्परकडून एका दलित सरपंचाचा खात्मा केला. हा घातपात आहे की अपघात याचा तपास होईल. पण, राज्यात एवढी भयानक चर्चा सुरू असूनही राखेचे टिप्पर बंद झाले नाहीत. याला परळीचे पोलिस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी जबाबदार आहेत. वाळूमाफिया, राखमाफिया, स्क्रॅप, गुटखामाफियांवर मकोकांतर्गत कारवाई हेच या प्रश्नाचे उत्तर आहे,’ असे आमदार सुरेश धस म्हणाले