ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मार्कर- PADUवरून फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नगरपालिकांच्या निवडणुकांचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित करत, स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीची खरी पायाभरणी असल्याचे ठामपणे सांगितले. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी नगरपालिकांमार्फत होते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतदान करणे हे केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले.

मतदानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. या हल्ल्यात शिंगणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर, तसेच पाय व डोक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार दुर्दैवी असून हा थेट लोकशाहीवरचा हल्ला असल्याचे म्हणत त्यांनी या घटनेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले. निवडणुकीत विजय मिळवता येणार नाही, असे वाटल्यावर हिंसेचा मार्ग स्वीकारला जातो, ही बाब लोकशाही मूल्यांना घातक असल्याची टीकाही त्यांनी केली.

राजकीय मतभेद असले तरी निवडणूक प्रक्रियेत हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा घटनांना जनता मतदानातून योग्य उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला. लोकशाहीत अंतिम निर्णय मतदारांच्याच हातात असतो, त्यामुळे शांतता, संयम आणि लोकशाही मार्गानेच राजकारण व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, मतदानावेळी बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईऐवजी मार्कर वापरण्यात येत असल्याबाबत आणि तो सहज पुसला जात असल्याच्या आरोपांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे निर्देश केला. मतदान प्रक्रियेचे नियम, साहित्य आणि पद्धती ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे निवडणूक आयोगाचा असून, मार्कर पेनचा वापर यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या संदर्भात कोणाला आक्षेप असल्यास आयोगाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

काही लोक निकालापूर्वीच पराभवाची मानसिक तयारी करून दोष कुणावर ढकलायचा याची रणनीती आखत असल्याचा टोला लगावत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2012 पासून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मार्करचा वापर होत असून, यंदाचा निर्णय अपवादात्मक नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी मार्करची निशाणी पुसली जात असल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने या निर्णयावर संशयाची छाया निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!