नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उदघाटन मोठ्या उत्साहात झाले असून नुकतेच जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात बुधवारी रात्री उशिरा नंदी महाराजांसमोरील लोखंडी अडथळे दूर करण्यात आले. तळघर सात दिवसांत उघडण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. काशी विश्वनाथ ट्रस्ट सदस्यांच्या उपस्थितीत पूजेची तयारी सुरू केली आहे. रात्री दीड वाजता ५ लोक ज्ञानवापीच्या दक्षिण भागात पोहोचले. वाराणसीचे आयुक्त कौशल राज शर्मा यांनी सांगितले की, गुरुवारी पहाटे तळघरात ३० वर्षांनंतर शृंगार आरती झाली. पूजेच्या अधिकाराविरोधात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा न मिळाल्याने अंजुमन इंतजामिया कमिटीने अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली. पण कोर्टाने तत्काळ सुनावणीस नकार दिला.
प्रशासनानुसार, २ ते ३ दिवसांत सर्व भक्तांसाठी तळघराचे द्वार खुले केले जातील. तळघरातील पूजा काशी विश्वनाथ मंदिराच्या नियमानुसारच होईल. ज्येष्ठ विधिज्ञ विष्णुशंकर जैन यांनी सांगितले की, सकाळी मंगल आरती, नंतर भोग आरती, सायंकाळी संध्या आरती, सूर्यास्त आरती झाल्यानंतर शयन आरती केली जाईल.पूजेत व्यास कुटुंबातील आशुतोष व्यास सहभागी झाले. पाचही पुजाऱ्यांनी गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या निर्देशांनुसार पूजा सुरू केली. आधी प्रायश्चित्त केले, क्षमा मागितली, नंतर गणेश अथर्वशीर्षाने पूजा सुरू झाली. तळघरात ३० वर्षांनंतर अखंड दीपाची स्थापना करण्यात आली.