ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे थोडक्यात बचाव

जम्मू   : वृत्तसंस्था

फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री एका व्यक्तीने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे गोळी त्यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. या घटनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ उडाली असून सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विवाह सोहळ्याला फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. लग्न समारंभादरम्यान कमल सिंग जामवाल नावाच्या व्यक्तीने अचानक फारुख अब्दुल्लांच्या मागून येत त्यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखली आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.  या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. फुटेजमध्ये हल्लेखोर मागून येऊन बंदूक रोखताना दिसत असून त्याच वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याचा हात बाजूला ढकलला. त्यामुळे झाडलेली गोळी हवेत गेली आणि मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव कमल सिंग जामवाल असून तो व्यावसायिक आहे. जुन्या शहरात त्याची काही दुकाने असल्याचेही सांगण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना धक्कादायक खुलासा करत “मी गेल्या २० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचा विचार करत होतो. हेच माझे उद्दिष्ट होते,” असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आरोपीकडे परवानाधारक शस्त्र असल्याचेही पोलिसांनी सांगितले. फारुख अब्दुल्ला आणि इतर नेते जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते सुरजित सिंग यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हल्लेखोर हा सुरजित सिंग यांचा चुलत भाऊ असल्याची माहितीही समोर आली आहे.

घटनेनंतर फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. “एक व्यक्ती भरलेली पिस्तूल घेऊन अगदी जवळ आला आणि गोळी झाडली. अल्लाहचे आभार की माझे वडील थोडक्यात बचावले. मात्र Z+ एनएसजी सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ कोणी कसे पोहोचले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनीही सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रॉयल पार्क येथे इतकी मोठी सुरक्षा चूक कशी झाली, याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण द्यावे, असे त्यांनी म्हटले. तसेच त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांची उपस्थिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!