ठाणे : वृत्तसंस्था
आम्ही जेव्हा अयोध्येत जातो, तेव्हा तिथे आम्हाला श्रीरामाचे अस्तित्व जाणवते. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी गर्वांचा, आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात म्हणाले. अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर कौपीनेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आज पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आणि प्रतीक्षा संपली आहे. हा ऐतिहासिक दिवस असून तो सोनेरी अक्षरात लिहिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि अयोध्येचे जुने नाते आहे. श्रीराम हे वनवासात असताना त्यांचे नाशिकच्या पंचवटीत वास्तव होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच श्रीरामांचे मंदिर उभारण्याकरता जे सागाचे लाकूड वापरण्यात आले आहे, ते महाराष्ट्रतील चंद्रपूर येथून पाठवण्यात आले आहे. ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना चांदीची गदा देण्यात आली. ती गदा मुख्यमंत्र्यांनी मंदिरात ठेवण्यास सांगितले. यावेळी प्रकाश पाटील यांनी कौपीनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाखांचा धनादेशही दिला.