ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डेड बॉडीमध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले ; मंत्री महाजनांचा ठाकरेंवर गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था

महायुती सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावले, कार्यकर्त्यांना कामाला लावावे. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचे काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरेतर लोकांनी तुम्हाला दिले नाही, तुम्ही दगाबाजी करून ते घेतल्याची टीका महाजन यांनी केली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, अडीच वर्षांमध्ये तुम्ही काय दिवे लावले तुम्ही घराच्या खाली उतरले नाही. डेड बॉडीमध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले किती लोक त्यामध्ये जेलमध्ये आहेत. कोरोना काळात मराठी माणसासाठी तुम्ही काय केले? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा गंभीर आरोप महाजन यांनी केला आहे.

मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. असे असताना कोणीही काहीही बोलावे, आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे, असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच इतक्या वर्षापासून आपल्या आरक्षणाची मागणी असताना कुठल्याही सरकारने आपल्या पदरात काही टाकलं नाही. ते फक्त देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी आरक्षणाबाबत वाचा फोडली आणि आमच्या समाजाच्या पदरात काहीतरी दिले. दुर्दैवाने कोर्टात ते टिकले नाही हा भाग वेगळा आहे. आणि दुर्दैवाने आमचे सरकार बदलले त्यामुळे ते कोर्टात तत्कालीन कॉंग्रेसचे सरकार टिकवू शकले नाही, त्यात आमचा दोष नाही.

मनोज जरांगे यांच्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, फडणवीस हे खुणशी आहेत असे म्हणण्याला काही अर्थ नाही, या वक्तव्याला कोणीही साथ देणार नाही असे महाजन म्हणाले. जरांगे पाटील काय बोलत आहेत हे आपण अनेक दिवसापासून ऐकत आहोत. जरांगे पाटील कुठल्या थराला जाऊन बोलत आहेत. आपल्या मागण्या आहेत त्या असू द्या रास्त मार्गाने मागितल्या पाहिजे. कोणाविषयी काही बोलावं मागच्या वेळी त्यांचा बोलण्याचा स्तर इतका खाली गेला होता की लोकांनाही कंटाळा आला होता. आपल्या जिभेवर संयम ठेवला पाहिजे, असा सल्ला महाजनांनी दिला आहे.

राज ठाकरेंवर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, बेस्ट निवडणुकीमध्ये ठप्पे मारले गेले. तुम्ही जो मराठी माणूस मराठी माणूस सांगावा करत आहात त्याला कोणी मतदान केलं? शून्य सुद्धा फोडता आला नाही, तुम्हाला कोणी मतदान सुद्धा केलं नाही. कधी मतपेट्या खराब झाल्या, कधी बॅलेट पेपर तर कधी मतदार याद्या खराब झाल्या असं तुम्ही म्हणायचे. लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि मग तुम्ही प्रत्येक वेळी नवीन नवीन कारण शोधायचे, असे म्हणत नाचता येईना अंगण वाकडे असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!