ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…वडील असते तर त्यांनाही आनंद झाला असता ; मंत्री पंकजा मुंडे !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतांना आता महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार व ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातही मोठा निर्णय जाहीर केला आहे. ठाकरे आणि पवार घराण्यातील एकत्रित भेटीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी सर्वांच्या जवळची आहे. माझे वडील असते तर त्यांनाही आनंद झाला असता.

ठाकरे आणि पवार घराण्यातील एकत्रित भेटीबद्दल पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, मी सर्वांच्या जवळची आहे. माझे वडील असते तर त्यांनाही आनंद झाला असता. मी कोणाला काय करावे, हे सांगू शकत नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यांच्या वेदना त्यांनाच माहीत असतात. त्यामुळे मी सूचना आणि सल्ले देण्याच्या भूमिकेत नाही. मात्र, सर्वांनी आपापल्या जागी आनंदाने आणि सुखाने काम करावे, अशी माझी इच्छा आहे.

दरम्यान, राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या, यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने आणि ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यापूर्वी 10 ते 20 टक्के बदल्या हव्या तशा होत होत्या. मात्र, आता समुपदेशन बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक अडचणी लक्षात घेऊन, 550 प्रशासकीय बदल्या केल्या जात आहेत. आजारी अधिकारी, विधवा महिला आणि पती-पत्नी एकत्र काम करू इच्छिणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

आगामी स्थानिक संस्थानच्या निवडणुकांविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, निवडणुका आल्यावर स्वबळावर लढायचे की महायुती म्हणून यावर चर्चा होईल. सध्या आम्ही महायुती म्हणून आहोत. महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला न पोहोचू शकल्याबद्दल दिलगिरी देखील यावेळी व्यक्त केली. पवार साहेबांनी तक्रार केली होती. आज आम्ही हेलिकॉप्टरने एकत्र येणार होतो. मात्र, ते आधीच पोहोचल्याने मला त्यांच्यासोबत जाता आले नाही. ढगाळ वातावरणामुळे मला रस्त्याने यावे लागले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!