ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इराण-अमेरिका संघर्षाची धग आखातात; दुबईसह परदेशात महाराष्ट्राचे शेकडो नागरिक अडकले !

विमानसेवा विस्कळीत; ९९ टक्के पर्यटन बुकिंग रद्द, मक्केतील भाविकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांची प्रतीक्षा वाढली

मुंबई : वृत्तसंस्था

मध्यपूर्वेत तणावाचे ढग अधिक गडद झाले असून इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा समोर आल्यानंतर आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने दुबईसह सहा देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे वृत्त असून, संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या संघर्षाचा थेट फटका महाराष्ट्रातील पर्यटक, विद्यार्थी आणि भाविकांना बसला आहे. दुबईसह विविध देशांत राज्याचे शेकडो नागरिक अडकून पडले असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

इराण-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत देशातील सुमारे १०० उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात ६२ आगमन आणि ४२ प्रस्थान उड्डाणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पर्यटनाचे जवळपास ९९ टक्के बुकिंग रद्द झाल्याने पर्यटन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे संचालक विश्वजीत पाटील यांनी सांगितले की, भीतीपोटी जवळपास ९० टक्के नागरिकांनी आपली परदेश वारी रद्द केली आहे.

मक्का येथे गेलेले नाशिकचे सुमारे २०० भाविक सध्या अडकले आहेत. जिद्दा विमानतळ बंद असल्याने यात्रेकरूंना मायदेशी परतता येत नाही. फारूक तांबोळी यांच्यामार्फत गेलेले ३५ जणही मक्केत असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी गेलेले जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक दुबईत अडकले आहेत. हल्ल्यांनंतर पर्यटन स्थळे व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली असून प्रशासनाकडून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती दुर्गेश चौधरी यांनी दिली. पिंपरीच्या माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्यासह ४० ज्येष्ठ नागरिकांचा गट २७ फेब्रुवारीपासून दुबईत आहे. विमान सेवा बंद असल्याने हा गट तेथेच अडकला आहे. त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

यवतमाळची विद्यार्थिनी जागृती जाधव १ मार्च रोजी परतणार होती; मात्र उड्डाण रद्द झाल्याने ती दुबईतच थांबली आहे. लातूरची नेहा मिसार ही ‘रोबोटिक इंजिनिअरिंग’च्या शिक्षणासाठी दुबईत गेली असून तिच्यासह धाराशिव, नाशिक आणि पुणे येथील २५ ते ३० विद्यार्थी अडकले आहेत.

उमरग्याचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि माशाळकर दांपत्यही दुबईत असून, तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. दुबईत नोकरीसाठी गेलेले भारतीय नागरिक तानाजी गोरड यांनी सांगितले की, “सध्या येथील स्थिती नियंत्रणात असून आम्ही सुरक्षित आहोत. खबरदारी म्हणून प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत.” दरम्यान, केंद्र सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र युद्धजन्य परिस्थिती किती काळ टिकणार आणि अडकलेल्या नागरिकांची सुटका कधी होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची धाकधूक वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!