ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रात जे चाललंय ते पटतंय का? : सभेपूर्वी मनसेकडून टीझर प्रसिद्ध !

मुंबई : वृत्तसंस्था 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा यंदा विशेष चर्चेत आला आहे. मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेचा अधिकृत टीझर मनसेकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला असून, तो अत्यंत आक्रमक आणि थेट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मनसेच्या टीझरमध्ये राज्यातील राजकीय घडामोडीमुळे सर्वसामान्य जनतेत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची प्रतिमा उभारीने मांडण्यात आली आहे. टीझरमध्ये काही बोचरे प्रश्न विचारले गेले आहेत:

  • महाराष्ट्रात जे चाललंय ते पटतंय का?

  • रोजच्या राजकीय घडामोडी पाहून मनस्ताप होतोय का?

  • राज्याची ही अवस्था पाहून तुम्ही अस्वस्थ आहात का?

या प्रश्नांद्वारे मनसेने सर्वसामान्य जनता एकटे नसल्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अशीच भावना आहे, हे अधोरेखित केले आहे. टीझरमध्ये “उज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवतीर्थावर भेटूया” असे आवाहनही करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी रायगडवर झालेल्या मनसेच्या २० व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करत “जे काही बोलायचे आहे, ते गुढीपाडव्याच्या सभेतच बोलेन” असे सूचक विधान केले होते. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की या मेळाव्यातून मनसेचा बदलेला राजकीय रंग आणि हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित होऊ शकते.

यंदाच्या मेळाव्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर राज ठाकरेंकडून कोणती अधिकृत भूमिका मांडली जाते, हे आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर रोहित पवारांनी सूचक विधान केले की, “अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी राज ठाकरे प्रयत्न करणार आहेत.” या संवेदनशील विषयावर राज ठाकरेंकडून काय निर्णय किंवा विधान येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुढीपाडवा मेळावा केवळ पारंपरिक उत्सव नसून, सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाचा मोठा सूचक ठरतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!