अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्याला प्रतीक्षेत असलेले बहुचर्चित उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात ३ जानेवारी अखेर पडणार आहे याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.उजनी धरणातून सात तारखेपासून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे.२० तारखेपर्यंत हे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यापर्यंत पोहोचले त्यानंतरच्या नऊ दिवसांमध्ये हननुर गावापर्यंत पोहोचले आहे शनिवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत हन्नुरच्या फुलापर्यंत पाणी येईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
पूर्वी पाण्याचा दाब कमी असल्यामुळे पाणी येण्यास उशीर झाला यानंतर आता दर्शनाळ कॅनॉलमधून येणारे जे पाणी आहे ते हरणा नदीत पडल्यानंतर पुन्हा नदीतील डोह भरत भरत पाणी पुढे येण्यास वेळ लागत आहे यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांनी हरणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पाडून पाणी उपसा करत आहेत आता हे पाणी सर्व डोह भरून पुढे सरकण्यास वेळ लागणार आहे.या पाण्यातून धरण किती टक्के भरणार याबाबतची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही पण कुरनूर धरणात पाणी पोहोचण्याची आशा मात्र नक्की निर्माण झालेली आहे.हन्नूरमध्ये पाणी पोहोचल्यानंतर अजून पुढे तीन दिवस लागणार आहेत.उजनी धरणातून पाणी सोडल्यापासून आत्तापर्यंत पाण्याचा प्रवास साधारण २५ दिवसाचा होणार आहे त्यानंतर हे पाणी कुरनूर धरणात येणार आहे यावर्षी अनेक अडथळे पार करत हे पाणी धरणात पोहोचत आहे पुढच्या वेळी मात्र अधिकाऱ्यांनी नियोजन चांगले केल्यास आणि उर्वरित कामे पूर्ण करून अडथळे दूर केल्यास पाणी पुरेशा दाबाने येण्यास अडचण येणार नाही.