बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आता जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून वाचवा, अशी विनवणी करत, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर लोटांगण घातल्याचा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. मोठा घातपात घडवून आणल्याचा कट असतानाही सरकार मुंडेंना ‘क्लीन चीट’ देणार असेल, तर हा अत्यंत वाईट प्रकार असून आपला या ‘नालायक’ सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार ११ दिवसांपूर्वी उघडकीस आला. जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. “माझ्या हत्येची सुपारी आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे” असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तर धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत, नार्को टेस्ट करून चौकशीला सामोरे जाण्याचे आव्हान जरांगेंना दिले होते. मनोज जरांगेंनी देखील हे आव्हान स्वीकारले होते. आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंबाबत उपरोक्त मोठा गौप्यस्फोट केलाय.
धनंजय मुंडे बोलून बाजूला होऊन जातात. आमिष दाखवून, ब्रेन वॉश करून, तरुणांना गुन्हेगारी वळवतात आणि कट घडवून आणतात, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. मला या चौकशीपासून लांब ठेवा, मी चौकशीला सामोरे गेलो, तर मराठा समाजाचे लोक मारतील, असे मुंडेंनी अजित पवारांना दिवसांपूर्वी भेट घेऊन सांगितले, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. मोठा घातपात घडवून आणत असताना, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंना क्लीन चीट देणार असतील, तर ही वाईट गोष्ट आहे. इतके नालायक सरकार मी आतापर्यंत कधीच बघितले नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.