मुंबई : वृत्तसंस्था
नववर्षात महाराष्ट्रात शिवसेने (ठाकरे) ला पुन्हा एकदा शिखरावर न्यायचे आहे. आपल्या पक्षाला नंबर एकचा पक्ष करायचा असून पुन्हा आपलाच मुख्यमंत्री करायचा र आहे. हा आमचा संकल्प असून ते स्वप्न आम्ही पूर्ण करणारच, असा निर्धार शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच राऊत यांनी थेट २०२४ मधील नव्या वर्षाचा संकल्प जाहीर केल्याने पुन्हा दावे-प्रतिदावे रंगण्याची चिन्हे आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) जागावाटपावरून वाद सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात शिवसेने (ठाकरे)ला पुन्हा नंबर एकचा पक्ष करायचा आहे. या महाराष्ट्रासह देशातील हुकूमशाहीचा नायनाट करायचा आहे, तो आमचा संकल्प आहे, असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत कोणतेही मतभेद, धुसफूस नाही. तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आणि समंजसपणा आहे, असे सांगतानाच वृत्तपत्रातील बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप मेरिटनुसारच होईल. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे जिंकण्याचे मेरिट आहे त्याच्याकडे ती जागा राहील, हे तीन पक्षांचे सूत्र आहे. इंडिया आघाडीचे देशभरासाठी हे सूत्र आहे, केवळ महाराष्ट्रापुरते नाही. आम्ही यापूर्वी २३ जागा लढत आलेलो आहोत, याचा पुनरुच्चार करत राऊत म्हणाले, एखाद्या जागेवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षाचा दावा मजबूत असेल तर त्यांचा विचार होऊ शकतो. एखाद्या जागेवर ठाकरे गटाचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते, असेही राऊत यांनी सांगितले.