ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीला पूर्णविराम : महापालिका निवडणुकीत काँग्रेस एकटीच मैदानात !

मुंबई वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय घोषणा करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस कोणत्याही आघाडीशिवाय थेट मैदानात उतरणार आहे. भाजप तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) गटाला थेट आव्हान देत, मुंबईकरांसाठी काँग्रेस एक सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय ठरेल, असा दावा त्यांनी केला.

चेन्निथला यांनी गेल्या चार वर्षांतील मुंबई महापालिकेच्या कारभारावर तीव्र टीका केली. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबईकरांचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. वाढते प्रदूषण, शहरातील रुग्णालयांची दयनीय अवस्था, अपुरी आरोग्यसेवा आणि सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार यामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीयांना कोणतीही ठोस मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तब्बल चार वर्षे न झाल्याबद्दल चेन्निथला यांनी थेट सत्ताधारी सरकारला जबाबदार धरले. सरकारला निवडणुका घ्यायच्या नव्हत्या, म्हणूनच महापालिकेच्या कारभारात थेट हस्तक्षेप करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. लोकशाही प्रक्रियेला डावलून प्रशासकीय पद्धतीने महापालिका चालवली गेली, ज्यामुळे मुंबईकरांचा प्रतिनिधी निवडण्याचा हक्क हिरावून घेतला गेला, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेचे रमेश चेन्निथला यांनी कौतुक केले. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, लोकशाही मूल्यांचे रक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले. आता मुंबईकरांना पुन्हा एकदा आपला लोकशाही हक्क बजावण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या या स्वबळाच्या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!