नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात आवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे तर अनेक भागात उन्हाळ्यात देखील पाणी येत नसल्याने नुकतेच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत एक मोठे भाष्य केले आहे. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्त्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो. न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल.