मुंबई वृत्तसंस्था : राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे वाक्य पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे अधोरेखित झाले आहे. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती जाहीर होताच ज्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला, पेढे वाटले, त्यापैकीच एक नेता अवघ्या 24 तासांत भाजपमध्ये दाखल झाला. या घटनेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिकमधील प्रभावशाली नेते दिनकर पाटील यांनी गुरुवारी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. राज ठाकरे यांनी त्यांना पक्षात मान-सन्मान, अधिकार आणि महत्त्वाची जबाबदारी दिली होती. अशा स्थितीत ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेला रामराम ठोकल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दिनकर पाटील यांचा राजकीय प्रवास हा पक्षांतरांनी भरलेला राहिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेमध्ये प्रवेश केला होता. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्याआधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.
मनसेमध्ये असताना दिनकर पाटील हे नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. सातपूर परिसरात त्यांचे वर्चस्व मानले जाते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी किंवा मुलाला तिकीट मिळण्याची शक्यता होती. मात्र, अचानक भाजप प्रवेशामागे हीच स्थानिक समीकरणे आणि राजकीय गणिते असल्याचे बोलले जात आहे.