पंढरपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता आता त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील वीर नदी खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या नीरा नदीचे पाणी भीमा नदीला मिळत असल्याने भीमा नदीला पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, भीमा नदीपात्रातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळुज हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर गुरसाळे येथील भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकले होते.
याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळताच पथकाकडून बचावकार्य सुरु करून तीनही महाराजांना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत.
सोमवार दिनांक २६ मे रोजी सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेले. मंदिराला पाण्याने वेढा दिला. त्यामुळे हे तिनही महाराज मंदिरातच अडकून पडले. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी गावकऱ्यांना सांगितले. यानंतर गावकऱ्यांनी पंढरपूर तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जीवरक्षक नावेच्या सहाय्याने महाराजांना बाहेर काढले.
नीरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या दगडी पुलावर 35 ते 40 हजार क्युसेसने पाणी वाहत आहे. भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीकडेला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. भाविकांनी खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये म्हणून आवाहन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच नगरपालिकेचे अग्निशमन दल जवान बोट घेऊन दगडी पुलाजवळ व नदीपात्रात बोटीद्वारे गस्त घालत आहेत.
यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ॲड सुनील वाळुजकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, आरोग्य अधिकारी तोडकर, अग्निशमन दल यंत्रणा व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच लगतच्या असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे.