मुंबई : वृत्तसंस्था
देशात बदलत्या हवामानामुळे आज राज्यातील विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशात हवामानातील बदल पाहायला मिळत आहे.
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपिट होण्याचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ तर उर्वरित मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानातही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.
विदर्भातसह मराठवाड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गडगडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मराठवाड्यात विशेषतः जालना हिंगोली परभणी आणि नांदेड या 4 जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर आज आणि उद्या खान्देश भागातील नाशिक नगर जळगाव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली असली तरी मराठवाड्यापासून विदर्भ, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत खंडीत वाऱ्यांची स्थिती विरली आहे. छत्तीसगडपासून विदर्भ, कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे.