ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसाचा कहर पुन्हा सुरू : सीना नदीला पूर, सोलापूर जिल्हा सतर्क !

सोलापूर : प्रतिनिधी

धाराशिव, सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यांना मागील १५ दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. धाराशिव जिल्ह्यात भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव शहरात संततधार सुरू असून, काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढत असल्याने नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातही पावसाने पुन्हा जोर धरला असून, सीना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, वाडकबाळ पुलावरील पाणी अद्याप ओसरलेले नाही. परिणामी, सोलापूर–विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील दृश्य ‘महामार्ग की तलाव?’ असा प्रश्न निर्माण करणारे आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोलापूर जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेता नदीकाठच्या गावातील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

माढा, करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील तहसीलदारांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जनावरे, घरगुती साहित्य आणि महत्वाची कागदपत्रे सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी हवामान विभागाचा पुढील अंदाज आणि प्रत्यक्षात पडणारा पाऊस यावर येणाऱ्या संकटाची तीव्रता ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!