ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रामदास आठवलेंनी घेतली फडणवीसांची भेट

 

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे राज्यातील प्रमुख नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली. यावेळी राज्यभरात पाच ते सहा जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी आठवले यांनी फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला निश्चित जागा सोडणे आवश्यक असून त्याबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाने केला आहे.

रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील केजमधून पप्पू कागदे, यवतमाळमधील उमरखेडमधून महेंद्र मानकर, त्यानंतर धारावी, चेंबूर, श्रीरामपूर, पिंपरी, उत्तर नागपूर, देगलूर या जागांवर रिपब्लिकन पक्षाने दावा केला असून यातील किमान पाच जागा रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला येतील, अशी अपेक्षा आहे. महायुतीचे पुन्हा सरकार आल्यावर रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, एक विधान परिषद सदस्यत्व, तीन महामंडळांचे अध्यक्षपद, तीन उपाध्यक्षपदे आणि सर्व महामंडळाचे सदस्यत्व, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांत पक्षाला जागा सोडाव्यात, अशा विविध मागण्या रिपब्लिकन पक्षातर्फे फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली.

विविध मागण्यांकडे वेधले लक्ष
सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे; गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी 14 एप्रिल 1990च्या मुदतीत वाढ करून 14 एप्रिल 2014 पर्यंत पात्रता निश्चित करावी. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून 450 चौ. फुटांचे घर झोपडीवासीयांना देण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश जाहीरनाम्यात करण्याची सूचना आठवले यांनी केली. शिष्टमंडळात राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!