ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरकरांना दिलासा : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आसनसंख्या वाढली, प्रवास होणार अधिक सुकर !

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोलापूर ते मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर असून आता प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे. सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार होणार असून 16 डब्यांची गाडी आता 20 डब्यांची होणार आहे. 28 ऑगस्टपासून ही वंदे भारत एक्स्प्रेस 312 जादा प्रवासी घेऊन धावणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने 4 जादा चेअर कार जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका डब्यात 78 सीट असतील. त्यामुळे 312 प्रवासी क्षमता वाढणार आहे. एरव्ही वंदे भारत धावण्याच्या एक दिवस अगोदर तिकीट उपलब्ध असतात. आता जादा डबे जोडल्यामुळे अधिकची तिकीटे उपलब्ध असणार आहेत. सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला प्रत्येकी 52 आसनांच्या 2 एक्झिक्युटिव्ह चेअर कार, प्रत्येकी 78 आसने असणाऱ्या 16 चेअर कार आणि 44 आसन क्षमतेच्या 2 चेअर कार असतील. त्यामुळे एकूण आसन क्षमता 1440 असणार आहे. दरम्यान, प्रवाशांना सोलापुरातून मुंबईला जाऊन 4 तासांचे काम करून एका दिवसात परत येता येईल. त्यासाठी वंदे भारतच्या या अपग्रेड केलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!