मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भुजबळांवर तीव्र टीका केली. “ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला आहे, जो स्वार्थासाठी इतरांना आमिष दाखवून काम करतो,” अशा शब्दांत त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
जरांगे पाटील म्हणाले, “छगन भुजबळ यांना सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे हवे आहे. मात्र आम्ही लोकशाही मार्गाने आमचे हक्क मिळवूनच राहू. तुला जे करायचे ते कर, आम्ही आमच्या हक्कासाठी लढणारच.” तसेच, “आम्ही आधीपासूनच कुणबी आणि ओबीसीच्या यादीत आहोत,” असे स्पष्ट करत त्यांनी भुजबळांच्या भूमिकेला विरोध दर्शवला.
छगन भुजबळ यांनी मराठा समाज पुढारलेला असून, तो मागास नाही, असे वक्तव्य केल्यावर त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, “तू काय कमी पुढारलेला आहेस का? तुझ्या प्रत्येक गावात जमिनी आहेत. गरीब ओबीसींना वेड्यात काढणारे भुजबळ कोण?” असा थेट सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर, “सरकारने भुजबळांवर गुन्हा दाखल करावा. तू म्हणजे काय मंत्रिमंडळ आहेस का?” असे म्हणत त्यांनी भुजबळांच्या राजकीय हस्तक्षेपावरही नाराजी व्यक्त केली.
“तुमच्यासारखा मी जातीवादी नाही”
वाद उभा करण्यासाठी, समाजात फूट पाडण्यासाठी भुजबळ यांच्याकडून प्रयत्न होत आहेत, असा आरोप करत जरांगे म्हणाले, “ओबीसी समाजाने आता शहाणे व्हावे. त्याच्या नादी लागू नये. जर त्यांनी आम्हाला चॅलेंज केले, तर आम्ही 1994 चा शासन निर्णयही चॅलेंज करू.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “ओबीसी महामंडळाला आम्ही काही म्हटलं का? महाज्योतीचा मुद्दा आम्ही कधी उपस्थित केला का? मी जातीवादी नाही. पण तुम्ही बोलावलेल्या उपसमितीत एकही मराठा नाही, हा सरळ जातीवाद नाही का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भुजबळांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.