ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संजय राऊतांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही ; नाना पटोले !

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक असेल, असा दावा देखील नाना पाटोले यांनी केला आहे. सध्या महाराष्ट्राचे चित्र पाहता काँग्रेस नक्कीच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणेल, असा दावा देखील त्यांनी केला. सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु असून या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

संजय राऊत यांच्या बद्दल आम्ही काहीही बोलणार नाही. त्यामुळे पत्रकारांनी देखील त्यांचे जास्त ऐकण्याची आवश्यकता नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेस लहान भाऊ – मोठा भाऊ करत असेल तर लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळेच त्यांच्या जागा वाढल्या असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. काँग्रेसमध्ये फार खुमखुमी असल्याचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नाना पटोले यांनी नकार दिला आहे. ते सकाळी रोजच बोलतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या दोन राजकीय नाटकांची चर्चा सध्या रंगली आहे. या पार्श्वभूमीवर देखील नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. स्वत:च्या जीवाला धोका असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे संरक्षण मागितले होते. त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट मुख्यमंत्री पदाची शपथच एकनाथ शिंदे यांना दिली. हेच महाराष्ट्रासाठी सर्वात मोठे नाटक असल्याची टीका देखील पटोले यांनी केली आहे. खोके वाल्या लोकांनी महाराष्ट्राचेच नाटक केले आहे. त्यामुळे कोणाला कोणते नाटक करायचे, ते करु द्या. महायुतीचे लोक वारंवार महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टाकण्याचे काम करत आहे. आमदारांना विकत घेण्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घेण्याचे काम महायुतीचे सरकार करत आहे. त्यामुळे नाटकापेक्षा त्यांच्या कृतीतून महाराष्ट्राची अब्रू वेशीला टांगली जात आहे. ती वाचवण्याचा काम काँग्रेस करणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

कोणाला जास्त तर कोणाला कमी जागा मिळतात हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात विजयी होण्याचा निकष सर्वात माहत्त्वाचा असल्याचा दावा देखील पटोले यांनी केला. त्यामुळे लहान भाऊ मोठा भाऊ अशा भूमिकेचा प्रश्नच येत नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. राज्यातील महागाई वाढवणारे, तरुणांच्या विरोधातील महाराष्ट्र द्रोही सकरकारला सत्तेतून बाहेर काढणे ही एकमेव काँग्रेसची भूमिका असल्याचेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!