रायगड : वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने बहाल केलेले तुतारी चिन्ह हे संघर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी आहे. सर्वसामान्यांच्या पाठिंब्यातून यश मिळवून जनतेची सेवा करण्याची संधी आपणाला पुन्हा मिळेल, असा आत्मविश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षातर्फे तुतारी निवडणूक चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, राज्यसभेच्या खा. फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार वंदना चव्हाण, आ. सुमन पाटील, आ. प्रसाद तनपुरे, माजी आमदार, अनिल तटकरे उपस्थित होते. हा एक वैचारिक धोरणांचा संघर्ष आहे. सामान्य माणसांत आत्मविश्वास वाढवण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी त्या काळात केली व त्यामधूनच हे राज्य उभे राहिले. त्यादृष्टीने तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, असेही शरद पवार म्हणाले.