ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता : सरकारला दिला तोडगा काढण्याचा सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सामाजिक विण दुबळी होत असल्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारला रास्त तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. आज आनंदाचा दिवस आहे. पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. सध्या दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांमध्ये एकवाक्यता कशी येईल हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणालेत.

महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासाठी नुकताच एक जीआर काढला. या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर कुणबी अर्थात ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण यामुळे ओबीसी बांधव नाराज झालेत. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला आहे. त्यातच बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार आपल्या समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर आदिवासी बांधवांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी एक समाज दुसऱ्या समाजाविरोधात उभा टाकत असताना शरद पवारांनी सरकारला या मुद्यावर रास्त तोडगा काढण्याचे व सर्वांमध्ये एकवाक्यता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवार शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आज मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. मी नुकतेच सामाजिक विण दुबळी होत असल्याची चिंता व्यक्त केली होती. बंजारा समाजाने नुकताच एक मोर्चा काढला. त्यांनी आपला समावेश आदिवासी समाजात करण्याची मागणी केली. बंजारा समाजाने ही मागणी करताच दुसऱ्या दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला. दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे. आता सरकारने दोन समित्या नेमल्या. त्याची काही आवश्यकता होती का?

एक समिती एका जातीची आणि दुसरी समिती दुसऱ्या जातीची. यामुळे दुसऱ्या घटकांचे मत विचारातच घेतले जाणार नाही. इथे सामंजस्य व एकता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांना एकत्र बसावे लागेल. रास्त मागण्यांची पूर्तता कशी करता येईल हे पाहिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांमध्ये एकवाक्यता कशी येईल हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

शरद पवारांनी यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचेही आवाहन केले. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊसाचे खूप नुकसान झाले आहे. आमच्याकडे जी माहिती आली, त्यात सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर पाणी साचले आहे. सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर पाणी वाहिल्याचे मी कधी ऐकले नव्हते. पुणे जिल्ह्यातही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत केली पाहिजे, असे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!