मुंबई : मुंबईत मागील दोन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवित हानी देखील झाली आहे. या सर्व कारणावरून अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.मुंबईतील मिठी नदी स्वच्छता, गटारे साफ करणे, भूमीगत गटार योजना आदींवर दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास का? असा संतप्त सवालही यावेळी राणा यांनी उपस्थित केला आहे.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, मुंबई महानगर पालिकेच्या या अनागोंदी कारभाराला शिवसेनाच जबाबदार असून ठाकरेंची तिसरी पिढी सुद्धा मुंबईकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचा घणाघाती टीका अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. मुंबई महानगर पालिका पाण्यात बुडाली असून मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा झाली असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
केंद्र सरकारने संसदीय समिती स्थापन करून मुंबई महानगर पालिकेच्या या अवाजवी खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे म्हणजे यातील उधळपट्टी व नेमके लाभार्थी कोण? हे बाहेर येईल असेही नवनीत राणा यांनी म्हंटले आहेत.
मुंबई मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा झाले असून माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे’ अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली आहे.