मुंबई : वृत्तसंस्था
सध्या राज्यात आगामी स्थानिक निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरू झाले आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी रणनीती तसेच पक्ष बांधणी सुरू केली आहे. अनेक नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येणे-जाणे देखील सुरू झाले आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात मोठा धमाका होणार असल्याची घोषणा केली होती. यावर ठाकरे गटालाच मोठा धक्का बसणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे.
कृपाल तुमाने म्हणाले, संजय राऊतांना सकाळी भोंगा वाजवण्याची सवय आहे. त्यांना काहीतरी बोलायचे असते म्हणून ते बोलतात. पण आम्ही लवकरच धमाका करणार आहोत. आता जी काही उरलेला सुरलेला ठाकरे गट राहिला आहे आता त्या ठाकरे गटाला आम्ही दसरा मेळाव्यानंतर एक मोठा दणका देणार आहोत. त्यानंतर त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून नेस्तनाबूत झाला आहे, असे तुमाने यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना कृपाल तुमाने म्हणाले, आमच्या संपर्कात त्यांचे दोन आमदार सोडले तर सर्वच आमदार आहेत. मुंबईतील 60 टक्के माजी नगरसेवक हे आमच्याकडे आलेले आहेत. त्यातील जे काही उर्वरित आहेत ते देखील आमच्या संपर्कात आहेत, तेही येण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फक्त मुहुर्त काढणे बाकी आहे. आम्ही मुहुर्त काढला की त्या दिवशी ते आमच्याकडे येतील, तेव्हा संजय राऊतांना दणका मिळेल. तसेच येत्या आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती जोरदार कामगिरी करेल, असा विश्वास देखील तुमाने यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कृपाल तुमाने यांनी केलेल्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन व्हायला निघाला आणि ते दुसऱ्यांचे आमदार विलीन व्हायच्या गोष्टी करत आहेत. आताची जी शिवसेना आहे, ही निष्ठावंतांचा आहे. जे लोक पक्ष सोडून गेले त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेचा अपमान केला आहे. भविष्यात शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होणार, असे संजय राऊत म्हणाले.