---Advertisement---

मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार, ते सरकारचे बाप नाही ; जरांगे पाटलांचा इशारा !

By team
On: September 9, 2025 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी मला विश्वासात घेतले नाही. मला त्याबाबतची कल्पना दिली नसल्याचे ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर तुम्हाला कल्पना द्यायला तुम्ही सरकारचे बाप आहात का? असा सवाल मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना केला. तसेच जीआरला हात लावल्यास सरकारला शांत बसू देणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरवरून ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. काढलेला जीआर हा प्रचंड दबावाखाली काढल्याचा दावा करत त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक 8 पानी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी ‘मराठा समाज’ या शब्दावर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाचा उल्लेख ओबीसी किंवा कुणबी अथवा मराठा – कुणबी किंवा कुणबी – मराठा असा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आता यावरून मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने हा जीआर काढला आहे. छगन भुजबळ यांनी आठ पानाचे किंवा आठशे पानाचे पत्र देऊ द्या. मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार. ते सरकारचा बाप नाही. सरकारने हेराफेरी करायची नाही. जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्याने फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ज्या अर्थी हे कोर्टात जायला तयार झाले, जीआर बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला लागलेत याचा अर्थ हा जीआर मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला आहे, असे जरांगे म्हणाले.

तुम्हाला कल्पना द्यायला तुम्ही सरकारचे बाप आहात का? अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तिथे संविधानाच्या पदावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आहेत. हे सर्व वेडे, त्यांना अक्कल नाही आणि तुम्ही एकटेच शहाणे, तुम्हाला एकट्याला अक्कल आहे का? असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला.

आता सरकारने छगन भुजबळ यांच्या म्हणण्यावर कायदा चालवायचा का? तुम्ही एकटे सरकारला वेठीस धरत आहात का? असे प्रश्नही मनोज जरांगेंनी उपस्थित केले. देवेंद्र फडणवीसांनी भुजबळ यांना तुरुगांत पाठवले पाहिजे, अन्यथा ते सगळ्या सरकारला डाग लावतील, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाजाचे आणि सरकारचे सर्व काही चांगले होत आहे. पण छगन भुजबळ ते होऊ देणार नाही. जीआरला हात लावल्यास सरकारला शांत बसू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!