मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी हा महामार्ग रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव सादर करत त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गावरील सरकारची भूमिका स्पष्ट केली.
राज्य सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो लादायचा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केली. सरकार या प्रकरणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढले पाऊल उचलेल, असे ते म्हणालेत. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सरकार कोणत्याही स्थितीत हा आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार हे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सरकारला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. पण तो लादायचा नाही. या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. काँग्रेस नेते बंटी पाटील यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळावर शेतकरी प्रतीक्षा करत होते. ते या मार्गाला विरोध करत नव्हते. त्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आम्हाला दिले आहे. त्याती एकही सही खोटी असेल तर त्यावर कारवाई केली जाईल.
प्रस्तावित महामार्गामु्ळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांचे चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना हा महामार्ग हवा आहे. समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यांतील जीवनमान बदलले. त्यानुसार या महामार्गामुळेही अनेकांचे जीवन बदलणार आहे. आज जसा या प्रकल्पाविरोधात मोर्चा आला, त्याहून तिप्पट गर्दी हा महामार्ग व्हावा यासाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाला होईल. ज्या गावांमध्ये सभा झाल्या. त्या गावांतील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. या प्रकरणी जमिनीच्या पाचपट भाव दिला असून, यासंबंधी विरोधकांनीही मदत करावी, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही आझाद मैदानावरील आंदोलनात सहभाग घेतला. त्यानंतर सभागृहात आल्यानंतर त्यांनी सरकारला या महामार्गाचा आग्रह सोडण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गावरील सरकारची बाजू स्पष्ट केली. या मार्गाद्वारे नागपूर रत्नागिरीला जोडले जाणार आहे. पण यापूर्वीच यासाठी एक मार्ग उपलब्ध आहे. सरकारने यासंबंधी थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आज महाराष्ट्रातील शेतकरी आझाद मैदानावर जमले आहेत. त्यांची संख्या मोजकी असली तरी त्यातील 5-50 शेतकऱ्यांना बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका समजावून घ्यावी, असे ते म्हणाले. ज्या शेतकऱ्यांनी सरकारला या प्रकल्पासाठी परवानगी दिली आहे. तेच पूर्वी या प्रकल्पाला विरोध करत होते. त्यामुळे त्यावर फेरविचार व्हावा. ज्यांनी स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले आहे ते निवेदन आमच्याकडे द्यावी, अशी मागणीही सतेज पाटलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.