ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘त्यांना’ संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही ; संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान !

सांगली : वृत्तसंस्था

राज्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे सातत्याने त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांची अनेक वक्तव्य ही वादग्रस्त ठरलेली आहेत. नुकतेच त्यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त विधान केले होते. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे भिडे म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता संभाजी भिडे यांनी एक मोठं विधान पाकिस्तान देशासाठी केले आहे.

सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी संभाजी भिडे यांनी मार्गदर्शन करताना पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. “पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही. हिंदुस्थान टिकवायचा असेल तर आज शत्रूला संपवलं पाहिजे, असे थेट विधान भिडेंनी केले आहे. पुढे ते म्हणाले, पण आज आपला शत्रू कोण? परका कोण? हेच न कळणारा मूर्ख समाज आहे.

संभाजी भिडे यांनी नवरात्री उत्सवात खेळल्या जाणाऱ्या दांडिया खेळावर वादग्रस्त विधान केले होते. “आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको, तर हिंदवी स्वराज्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती. त्याच प्रेरणेने आम्ही दुर्गामाता दौड घेतो. आपण गणपती व नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचे विकृतीकरण केले आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे. भारत हा 1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची, गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे, असेही संभाजी भिडे म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!