ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर भाजपच कॉंग्रेसयुक्त झाला ; कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, असे विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानाला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत भाजपवर सडकून टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटले की, “काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे. अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा.” भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना कॉंग्रेस तोडा, असे वक्तव्य केले होते. यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. संग्राम थोपटे यांनी सगळे काही काँग्रेसला दिले तरी सुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. कुठलेही धोरण काँग्रेसला नाही. जो जो काँग्रेस किंवा इतर पार्टीमधून आमच्याकडे येईल त्याचे स्वागत आहे. काँग्रेसला फोडा, काँग्रेसला रिकामी करा. तुम्ही थकून जाल इतके जण आमच्याकडे येत आहेत. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार, असे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले होते.

पुणे येथे मागच्या आठवड्यात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीवर टीका केली होती.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंचा शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही तर आम्ही काय करावे. शिवसेना ठाकरे गटाचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येत आहोत आता आम्ही काय करायला हवे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!