ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्धव ठाकरे तयार, राज ठाकरेंनी ठरवावे ; नेत्याचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार बातम्या सुरु असतांना यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलंय, सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहोत, आता आमच्या सोबत एकत्र यायचं की नाही, हे राज ठाकरे यांनी ठरवायचे आहे, असे अनिल परब म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युती करणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी नुकतेच एका पॉडकास्टमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केले होते. महाराष्ट्रासमोर आमची भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्रासाठी आम्हाला एकत्र येण्यात काहीच अडचण नाही, असे ते म्हणाले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात आम्ही पण भांडणे बाजूला ठेवायला तयार आहोत, असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला. आता अनिल परब यांनी केलेल्या विधानामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही चर्चेची दार कधीच बंद केली नाहीत, असे विधान आमदार अनिल परब यांनी केले आहे. दोन्ही प्रमुख नेते भेटतील चर्चा करतील आणि ठरवतील. दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ. जशा निवडणुका जवळ येतील तसे दोन नेते निर्णय घेतील. मी छोटा नेता आहे. दोघे नेते बसतील आणि ठरवतील, असेही परब यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की, सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत. आता आमच्या सोबत एकत्र यायचे की नाही, हे राज ठाकरे यांनी ठरावयाचे आहे. महाराष्ट्र हितासाठी त्यांनी ठरावावे आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत.

अनिल परब यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली. शेवटी भाजपने ज्याचा सतत विरोध केला होता, तो विरोध झुगारुन छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिले असे ते म्हणाले. भाजप आपल्याच भूमिकेला तिलांजली देत असल्याची टीका त्यांनी केली. हे सरकार राक्षसी बहुमतात आहे, भाजप कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांनी मेहनत करून सत्तेत येऊन सुद्धा काही फायदा होत नाही. त्यामुळे कटशाह करण्याचा काम या सरकारमध्ये सुरु आहे. पालक मंत्रीपद आणि वेगवेगळी गणित मांडण्यात त्यांचा वेळ जातोय, अशा शब्दांत अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!