ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उजनीचे पाणी एकरुखद्वारे २० ऑगस्टपासून सोडणार ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे येत्या २० ऑगस्टपासून उजनीचे पाणी कुरनूर धरणात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली दिली.या निर्णयाने अक्कलकोट आणि  दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे, धीरज साळे, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर, मोहन जाधवर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पुरेशा पावसाअभावी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून धरणात देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे उजनीचे पाणी कुरनूर धरणात सोडावे अशी मागणी सातत्याने होत होती.या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती.निवेदन दिले होते.चर्चा केली होती.परंतु कालव्यामध्ये साचलेले मोठ्या प्रमाणात गाळ, वाढलेले झाडेझुडपे, त्याला पडलेल्या प्रचंड भेगा, त्यात साचलेला गाळ या सर्व अडथळ्याने आता पर्यंत पाणी सोडता आले नाही.गेल्या पंधरा दिवसात सातत्याने प्रयत्न करून त्या कालव्यातील सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.आता सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय झालेला असून सोडलेले पाणी कुरनूर धरणापर्यंत पूर्ण क्षमतेने आणि वेगाने
येण्यास मदत होणार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.उजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला असून नदीद्वारे व कालव्याद्वारे विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. सदरचे अतिरिक्त पाणी बोरी मध्यम प्रकल्प व एकरुख उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील इतर तलावात सोडण्याची मागणी केली होती.त्या अनुषंगाने ही बैठक पार पडली.या बैठकीत २० ऑगस्ट पासून एकरुख उपसा सिंचन  योजना कार्यान्वित करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी देखील सहमती दर्शवली आहे.जलसंपदा विभागाकडून कारंबा शाखा कालव्यातील गाळ काढण्याचे काम तसेच कारंबा पंपगृह व एकरुख उपसा सिंचन योजनेच्या हगलूर पंपगृह व बोरामणी पंप गृहातील यांत्रिकी व विद्युत विभागाची सर्व कामे पूर्ण झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी या बैठकीत  दिली. एकरुख उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील बोरी मध्यम प्रकल्प, दर्गनहळळी, कर्देहळळी, रामपूर व आवश्यकतेनुसार अन्य लगतच्या तलावात पाणी सोडण्याचा निर्णय  या बैठकीत घेण्यात आला.

शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

मागील वर्षी उजनीत कमी पाणीसाठा असल्याने कुरनूर धरणात पूर्ण क्षमतेने एकरूख उपसा सिंचन योजनेत पाणी सोडता आले नाही. त्याचवेळी पुढील वर्षी उजनी शंभर टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार निर्णय झाला आहे. कमी पावसाळ्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असताना पाणी सोडण्यात
येत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • सचिन कल्याणशेट्टी,आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!