अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात, एक सर्वसामान्य वडापाव विक्रेत्याने दाखवलेली सामाजिक बांधिलकी सध्या अक्कलकोटकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. अक्कलकोट येथील पुणेरी वडापाव सेंटर तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस २१ हजार रुपये मदत देण्यात आली असून,आपला अन्नदाता शेतकरी जगला तरच आपण जगतो हा संदेश त्यांनी दिला आहे.
पोटभर अन्न देणारा शेतकरी आज संकटात आहे, या भावनेतून प्रेरित होत पुणेरी वडापाव सेंटरचे मालक यशवंत चव्हाण यांनी ही मदत दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार,आपल्या व्यवसायावर ग्राहकांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून ‘फुल नाही, फुलाची पाकळी’ या भावनेने आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीस योगदान दिले.
चव्हाण पुढे म्हणाले,आपण सर्वसामान्य माणूस असलो तरी देशावर किंवा राज्यावर संकट आले की प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. शासन आपले काम करतच असते, पण नागरिकांनीही काहीतरी परत दिले पाहिजे. आपण जर आपल्या सुखसोयींवर थोडे नियंत्रण ठेवले आणि १०० रुपयेसुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीत दिले, तरी तो शेतकऱ्यांसाठी अमूल्य ठरेल.
अतिवृष्टीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे पिक, जनावरे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे आज उद्याच्या आशेवर जगत आहेत. या पार्श्वभूमीवर, एका वडापाव विक्रेत्याने स्वतःच्या उत्पन्नातून दिलेली मदत ही केवळ आर्थिक नाही, तर माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देणारी आहे.
चव्हाण यांनी या निमित्ताने देशप्रेमाचा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारी कविता देखील मांडली.देश हमे देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें।औरों का भी
हित हो जिसमें,हम ऐसा कुछ करना सीखें।। या भावनेतून आजच्या स्पर्धेच्या आणि स्वार्थाच्या काळात, अशा सामान्य माणसांनी दाखवलेली ही असामान्य जाणीव समाजात मानवतेचा दीप पेटवणारी आहे.