मुंबई : वृत्तसंस्था
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत असतांना आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारले पाहिजे. पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हावे, आपण युद्ध टाळण्यासाठी खूप संधी दिली आहे. आता पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याची वेळ आली आहे. शरद पोंक्षे पुढे बोलताना म्हणाले की, आता इतिहासातील सगळ्या गोष्टीचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आता नकाशावरून सगळे संपवूनच टाकूया. मोदींवर माझा खूप विश्वास आहे ते सर्व करून दाखवतात जास्त बोलत नाहीत.
शरद पोंक्षे म्हणाले की, पाकिस्तानच्या विषयावर कलाकार यावर बोलत नाहीत, याच्याशी मला देणंघेणं नाही. मी अभिनेता आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे. माझं स्पष्ट मत आहे की, पाकिस्तानशी सगळे संबंध तोडले पाहिजे, पाणी अडवले पाहिजे.
शरद पोंक्षे म्हणाले की, आपल्या लोकांना दहशतवादी मारत असतानाचे व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिले आहेत. ज्यांच्या घरातील लोकांना मारले ते सांगत आहे की धर्म विचारून मारले पण काही राजकीय नेते धर्म विचारला नाही असे म्हणत असतील तर त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ असो, असा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना त्यांनी लगावला आहे.
शरद पोंक्षे म्हणाले की, पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यात जे बांधव मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल असं पाऊल उचलले जाईल. एकदा लचका कापावा लागतो, ती वेळ आता आली आहे. हिंदुत्व म्हणजेच पुरोगामित्व आहे हे दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी हिंदुत्ववादी म्हणजेच पुरोगामी आहे.