नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यानंतर अजित पवार गटात मोठी नाराजी सुरु झाली होती. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर त्यांच्या जागी भुजबळ येतील हे अपेक्षितच होते, पण त्यासाठीही भुजबळांना बरीच वाट पाहायला लागली. भुजबळ हे ओबीसी समाजाचे मातब्बर नेते समजले जातात. अखेर भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. त्यानंतर आज भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.
ते म्हणाले की, “मला काल मीडियाने विचारले, तुम्ही म्हणाले होते, ‘जहा नही चैना वहा नही रेहेना’ मग मी म्हणालो ‘देर आये दुरुस्त आये’ काही लोक थोड्या वेळ या घरात तर थोड्या वेळ त्या घरात असतात, अशा लोकांना हे दु:ख कळणार नाही. मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच नाही सांगितलं, असा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले.
माझ्या पेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्यांना झाला, हा साप शिडीचा खेळ आहे. थोडं वर गेलं की खाली देखील येतं. चालूच असतं, त्याला कोण काय करणार. कधीकधी अशा गोष्टी पण घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं.
छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादी पक्षांतर्ग नाराजी पसरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अनेक आमदारांनी दांडी मारली होते. वारंवार भुजबळांनाच संधी दिली जात असल्याने पक्षातील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस सरकारमध्ये डावलण्यात आलेले माजी मंत्री आणि मंत्रीपदाची अपेक्षा बाळगून असलेले आमदार देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.