मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवतरलेली थंडी सध्या घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे.
गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या २४ तासात मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 12 जानेवारीनंतर राज्यात थंडीची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
त्याचसोबत मराठवाडा आणि विदर्भातही 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर येत्या मंगळवारपासून (12 जानेवारी) थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 12 जानेवारीनंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घट होण्याची शक्यता असेल. यामुळे थंडीत वाढ होऊ शकते.