पुणे : मुंबईचा ठेका फक्त शिवसेनेलाच दिलेला नाही. आम्ही पण मराठी आहोत व भाजपमध्ये पण मराठी माणसे आहेत. भगवा हा छत्रपति शिवाजी महाराज यांचा आहे. शिवसेनेला याचे पेंटट दिलेले नाही. उलट ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, केवळ सत्तेसाठी त्याच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे, त्यामुळे तुम्हीच भगव्याशी प्रतारणा केली आहे, त्यामुळे हिंदुत्वाचा भगवा कोणाच्या हाती द्यायचा हे आगामी महापालिका निवडणुकीत जनताच ठरवेल अशी ऱोखठोक भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांनी आज मांडली.
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर पुण्याच्या दौ-यावर आहेत. यानिमित्ताने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत भाजपच्या कार्यकारिणीत जे ८-१० प्रमुख मुद्दे मांडले त्यावर एकाही विषयावर शिवसेनेला स्पष्टीकरण देता आले नाही. कारण शिवसेनेला विकासाच्या मुद्दयावर बोलायचे नाही केवळ भावनिक वातावरण तयार करायचे आहे. कधी राज्यपाल तर केंद्र सरकारच्या विषयावरुन वाद घडवून आणायचा आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन पक्षाचे असले यामध्ये फक्त शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व दिसत आहे. कॉंग्रसेला मात्र डावलले जात आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेकडून कॉंग्रसेची सातत्याने फरफट होत आहे. या ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद व ताळमेळ दिसत नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
पदवीधरांचे विविध प्रश्न व समस्या या सरकारमध्ये आहेत. या सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. रोजगाराचा व स्वंयरोजगाराची प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व पदवीधरांना ख-या अर्थाने आपला आवाज विधीमंडळात पोहचविण्यासाठी उमेदवार संग्राम देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.