अक्कलकोट : दोन दिवसांपासून सातत्याने बोरी व हरणा नदीच्या परिसरात पावसाचे वातावरण असल्याने कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्याकडे सुरू आहे. धरण सध्या ४६ टक्के भरले असून आज किंवा उद्या पन्नास टक्क्यांची पातळी ओलांडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे.चार दिवसापूर्वी केवळ हरणा नदी द्वारे पाण्याचा प्रवाह सुरू होता. त्यामुळे धरणांमध्ये ३० ते ३५ टक्के पाण्यामध्ये वाढ झाली होती.
मागच्या दोन दिवसापासून मात्र बोरी नदी वाटे देखील पाणी सुरू झाले आहे. नळदुर्गचा नर मादी धबधबा सुरू झाल्याने बोरी नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असून धरणाची वाटचाल ही ५० टक्क्याकडे सुरू झाली आहे. पुढच्या आठवडाभरात असाच पाऊस झाल्यास धरण १०० टक्केही भरू शकते, असा अंदाज अधिकार्यांनी वर्तवला आहे. हे धरण दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात भरत असते परंतु यावर्षी जुलैच्या महिन्याच्या शेवटी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे.
धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच जुलैमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या धरणावर हजारो शेतकऱ्यांची पाईपलाईन व अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाण्यामुळे तूर्तास तरी सर्वांचा पाणीप्रश्न मिटला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी देखील तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे धरण जुलैच्या शेवटी पन्नास टक्के भरत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.