ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चप्‍पळगाव मतदारसंघात उमेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा;  मतदारसंघावर मातब्बर नेत्यांचे लक्ष

मारुती बावडे

अक्कलकोट : चपळगाव येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमानंतर चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात उद्योजक उमेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करता ते राष्ट्रवादीमध्ये जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या राज्य पातळीवर राष्ट्रवादी,  काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांमध्ये युती आहे. त्यामुळे त्यांना गळ टाकण्याची तयारी वरच्या पातळीवरील नेत्यांनामधूनच आतापासूनच सुरू झाली आहे.

सध्या चप्‍पळगाव जिल्हा परिषद मतदारसंघावर अनेक मातब्बर नेत्यांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत उमेश पाटील यांच्या सरकार चेहरा आपल्या पक्षाला लाभावा यासाठी नेते प्रयत्नशील आहेत. वास्तविक पाहता उमेश पाटील हे एक उद्योजक आहेत स्वभावाने मितभाषी, संयमी आणि अभ्यासू तसेच विकासाचे व्हिजन असलेले नेते म्हणून ओळख आहे. समाजकारणाच्या माध्यमातून ते लोकांच्या अग्रहाखातर राजकारणात आले आहेत. त्यात त्यांनी दोन वेळा चपळगावचे सरपंचपद भुषविले आहे.

त्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन गावातही एक हाती सत्ता स्थापन केली आहे. शैक्षणिक संस्था निर्माण करून चपळगाव परिसरामध्ये गोरगरीब मुलांना शिक्षण व्यवस्था उभी केली आहे.शेतकऱ्यांनाही आपल्या उद्योगाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. उमेश पाटील हे जरी उद्योजक असले तरी चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांची चांगली जनसंपर्काची साखळी आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.

सध्या ते जो पक्ष विकास करतो त्यांच्या सोबत आहेत असे ते नेहमी सांगत
असतात. परंतु काल झालेल्या राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावून मात्र नागरिकांच्या चर्चेला जोर आला आहे. त्यांचा फोटो असलेला बॅनरही चपळ गावात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झळकला आहे. त्यामुळे या परिसरात त्यांच्या पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते जर राष्ट्रवादीत आले तर त्यांच्या माध्यमातून या भागाला राष्ट्रवादीला तगडा नेता मिळू शकतो, त्याचाच विचार करून राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी थेट जाहीर व्यासपीठावरून त्यांना आपण काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्याकडे येत राहा अशा प्रकारचे जाहीर आवाहन करून एक प्रकारे त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफरच दिली आहे.

सरपंच उमेश पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते जर या मतदारसंघातून समोर गेले तरी विरोधी पक्षांसमोर तगडे आव्हान निर्माण होणार आहे.  जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत अजून आरक्षणही जाहीर झालेले नाही अशा परिस्थितीत मतदारसंघात सध्या तरी उमेश पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.  दरम्यान याबाबतीत सरपंच उमेश पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, जो पक्ष विकास कामे करतो. त्यांच्यासोबत मी राहणार आहे. सध्यातरी कोणता विचार माझ्या डोक्यामध्ये नाही. परंतु जनतेच्या मनामध्ये जर मी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी इच्छा असेल तर आपण याचा जरूर विचार करू पण कोणत्या पक्षामधून हे देखील जनताच ठरवेल. सध्या तरी
फक्त जनतेची सेवा आणि काम हेच आपल्यासमोरचे ध्येय आहे,  असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!