मारुती बावडे
अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट शहरात आता दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी सुरू आहे. आज पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेअंतर्गत १३० जणांची तपासणी करण्यात आली.या मोहिमेचा आज दुसरा दिवस होता.
अक्कलकोट येथील कारंजा चौकात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात ग्रामीण भागातील लोक हे खरेदी-विक्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येतात. यामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आलेल्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करूनच कार्यालयात सोडण्यात आले.
पहिल्या दिवशी एमएसईबी बायपास चौकामध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. आज शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार ही मोहीम अशीच चालू राहणार असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.
यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते, यांच्यासह प्रभारी दुय्यम निबंधक दिलीप काकडे, कनिष्ठ लिपिक राहुल घाटगे, बसवराज कोळी, युवराज शिंदे, विठ्ठल तेली, भागवत सांगोलकर, सुरज राऊत नवनाथ शिंदे, माणिक साळुंके, शकील पठाण,मुल्ला आदी उपस्थित होते.