मुंबई : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज सकाळी छापा टाकला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे. छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच होते अशी माहिती समोर आली आहे.
औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केले होते. यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत. मालक नाही, असं खोतकर यांनी स्पष्ट केले होते.
शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या जालन्यायेथील घरी आज सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा पडला. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहे. १२ जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही अशी माहिती देण्यात आले.






