मुंबई : राम मंदिरसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी दादरमधील शिवसेना भवनासमोर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते एकवटले होते.यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर शिवसेनेचे कार्यकर्तेही तेथे जमले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीही झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीकाही केली.टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे. हे आम्हाला अजूनही कळत नाही, असेही शेलार यांनी म्हटले आहे.






