गुरुशांत माशाळ,
दुधनी दि.१३ : अक्कलकोट तालुक्यात यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने उडीद, मूग आणि खरीप हंगामातील इतर पीके जोमदार पद्धतीने वाढ होताना दिसत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुधनी आणि परिसरात सध्या उडीद, मूग, मटकीचे काढणी सुरू असून बाजारात उडीद, मूग बाजारात येत असून त्याला चांगला दरही मिळत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून उडदाची काढणी सुरू झाली आहे. महिला मजुरांची जुळवा-जुळव करीत रास करण्याची लगबग चालू झाली आहे.
दुधनी येथील श्री शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप हंगामातील उडीद व मुग या शेतमालाच्या आवाकाला सुरुवात झाली असून बुधवारी उडदाला सरकारी हमी भावापेक्षा अधिक दर मिळाले आहे. उडदाला सरकारी हमी भाव ६,००० रुपये, मुग प्रति क्विंटल इतकी आहे. सौदा बाजारात उडदाला प्रति क्विंटलला सात हजार सहाशे पन्नास (७६५०/-) रुपये तर मुगाला सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये (६५४५/-) भाव मिळाला, यामुळे शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे.
शेतीमाल विक्री करताना काही अडचणी आल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीस संपर्क साधावे असे आवाहन दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश शंकरराव म्हेत्रे यांनी केले आहेत.