अक्कलकोट : तालुक्यातील बोरगाव (दे ) येथील विठाबाई पंडित हत्तरके (वय – ६०) यांचे शेतात काम करत असताना विषारी सापाने डाव्या पायाच्या बोटाला चावा घेतल्याने उपचारादरम्यान त्यांचा अक्कलकोट येथे मृत्य झाला. ही घटना शनिवार दि.२१ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
पती पंडित हत्तरके व पत्नी विठाबाई हे दिवसभर आपल्या शेतातील ऊसात खुरपणी करत होते. सायंकाळी ६ च्या दरम्यान पावसाचे चित्र बघून लगबगीने घरी येण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या ऊसाच्या फडातून घरी येण्यासाठी निघाले असता बोरगाव – घोळसगांव रस्त्यावर आले. इतक्यात अक्कलकोट घोळसगांव एसटी बस आली. शेत ओलांडून डांबरी रस्त्याने गावाकडे जावे या विचारत असताना अचानक एसटी बस आली त्यामुळे एक पाऊल पाठीमागे घेतल्या. जो पाऊल पाठीमागे सारला तोच पाऊल गवतात बसलेल्या विषारी सापावर पडला. अंगावर पाय पडताच सापाने मयत विठाबाईला कडकडून चावा घेतला.
मयत विठाबाई यांना साप चावल्याची जाणीव झाली आणि सापालाही पाहिले. साप चावलेल्या विठाबाईने आरडाओरडा केला इतक्यात लोक जमा झाले आणि खाजगी वाहन करून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय गाठले. रस्त्यातच मयत विठाबाई मान टाकल्या होत्या. उपचारासापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दिवसभर शेतात कष्ट करून घरी परतणाऱ्या मयत विठाबाई हत्तरके यांच्यावर काळाने घाला घातला.
मयत विठाबाईच्या निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावात शोककळा पसरली. शेतीवर उपजीविका करून जगणाऱ्या हत्तरके कुटुंबावर नियतीने घाला घातला याचे गावातून दुःख व्यक्त होत आहे. घटनेची माहिती पती पंडित हत्तरके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे.