ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल, पिकांसाठी शेतकऱ्यांनी मात्र घाबरू नये, कृषी विभागाचे आवाहन

अक्कलकोट : सोलापूरसह राज्यात एकोणीस जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस पावसाची जोरदार बॅटिंग राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात सतत दोन दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक मानला जात आहे. वातावरणात गारवाही प्रचंड वाढला आहे.

या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हा पाऊस ज्वारी,तूर हरभरा,फळबाग
आदी पिकांना लाभदायक असल्याचे
बोलले जात आहे. जर तुरीचे पीक फुलात असेल आणि अवकाळी पावसाचा जोर अधिक असेल तर तुरीच्या झाडावरील फुल गळती मात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच हरभरा पिकाला अधिक पाऊस झाल्यास पिकात पाणी साचून हरभरा पिकांना फटका बसू शकतो, असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मध्यम स्वरूपचा पाऊस पडत असल्याने या अवकाळी पावसाचा सध्याच्या रब्बी पिकांना अधिक फायदा होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.

या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फायदा होत असला तरी इकडे साखर कारखानदार, ऊस तोड कामगार व काढणीस आलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मात्र चिंतातूर झाले आहेत. या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मात्र या पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून चार दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यापुढे अधिक पाऊस झाल्यास मात्र कांदा, हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे पुढील काळात काय परिस्थिती निर्माण होईल, हे सध्या तरी सांगता येत नाही असे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!