अक्कलकोटमधील महिला डॉक्टरांनी वाचविले एका तृतीय पंथीयाचे प्राण … !
डॉ.शिवलीला माळी यांची सामाजिक बांधिलकी
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१३ : हल्ली समाजामध्ये स्वार्थी भावना वाढत चालली आहे अशा परिस्थितीमध्ये काही संबंध नसताना एखाद्या विषयी सहवेदना बाळगून प्राण वाचविण्याच्या घटना दुर्मिळच आहेत अशीच एक घटना अक्कलकोट मधील समर्थ नगरमध्ये घडली आहे. डॉ.शिवलीला माळी यांच्यामुळे एका तृतीय पंथीयाचे प्राण वाचले आहेत.समर्थनगर परिसरामध्ये परवा रात्री एक तृतीयपंथी माणूस आपल्या बहिणीच्या सोबत जात होता. अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला त्याची भगिनी त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होती. लोक मदतीसाठी जमू लागले.त्याचवेळेस जेऊर आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शिवलीला माळी या आपल्या भावासह तिथून चालल्या होत्या त्यांनी लगेच आपली गाडी थांबून त्या बेशुद्ध व्यक्तीला तपासले व तिथेच रस्त्यावरती हार्ट पंपिंग केले.हार्ट पंपिंग केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये थोड्याशा संवेदना जागृत झाल्या.डॉ. शिवलीला यांनी त्वरित प्रथमोपचार करून त्या व्यक्तीस ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे हलविण्यास सांगितले.यावेळी मेजर नटूलाल जमादार यांनी आपल्या गाडीवरती बसवुन त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.याचवेळी जयप्रकाश गुरव,जितेंद्र जाजू ,अमोल स्वामी,नरेगल आदींनी त्या व्यक्तीस प्रथम उपचारासाठी मदत केली व त्वरित पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलविले. डॉ.शिवलीला यांनी अज्ञात व्यक्तीला रोडवरती तपासून प्रथमोपचार करून रुग्णालयात दूरध्वनीवरून सर्व पुढील व्यवस्था पाहिली.डॉ.माळी यांनी कोरोना काळातही मोठे योगदान दिले आहे.अज्ञात व्यक्तीसाठी कर्तव्य भावनेतून केलेले प्रथम उपचार यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले.याबद्दल समाजातून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.