मुंबई : वृत्तसंस्था
देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भाजपसह इंडिया आघाडी कामाला लागली असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असल्याचे समजते. तीन राज्यांतील निवडणूक निकाल आमच्यासाठी समाधानकारक नाहीत. मात्र त्यामुळे आम्ही नाउमेदही झालो नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत ही उणीव भरून काढण्यासाठी जनता इंडिया आघाडीला मदत करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केला.
‘मोदींविरोधात आघाडीकडे चेहरा नाही,’ अशी टीका केली जात आहे. या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘१९७७ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी कुणाचाही चेहरा समोर न करता आम्ही लढलो होताे. निवडणूक निकालानंतर सर्वसंमतीने मोरारजी देसाई यांना पंतप्रधान म्हणून निवडले होते. आताही चेहरा समोर न करता इंडिया आघाडी (माेदींना) सक्षम पर्याय देऊ शकते,’ असा विश्वास पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
व्याजातून दरवर्षी शेतकरी महिलेचा सन्मान करणारपहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृत्यर्थ पहिला पुरस्कार शरद पवार यांना देण्यात आला. ५ लाख रुपये, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पवारांनी त्यात १५ लाख रुपयांची भर टाकली. आता २० लाखांच्या व्याजातून दरवर्षी विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेस पुरस्कार देण्याची घोषणा पवारांनी केली. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दुर्दैवाने आज राजकारणाचा अर्थ सत्ताकारण झाला आहे. पण राजकारण हेच समाजकारण समजून कृषीसह इतर क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठीशी पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभे राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.